Akola भारत देशाला जागतिक महासत्ताक बनवण्याकडे अग्रसित होत असताना कृषीप्रधान संस्कृती व सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्राची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने कृषी पदवीधरांवर अधिक उमेद असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारोहात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी उपस्थित पदविकांक्षींना मोलाचे मार्गदर्शन साधला. आपल्या अतिशय प्रेरणादायी संबोधनात त्यांनी देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी क्षेत्राचे भवितव्यावर सखोल प्रकाश टाकला व शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठानी मध्यवर्ती भूमिका बजवावी असे आवाहन याप्रसंगी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी पूढे संबोधित करतांना काही वर्षांपुर्वी भारत अन्नधान्याच्या क्षेत्रात जगावर विसंबून होता, तेंव्हा निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात व्हायचे. आता परिस्थिती बदलली असून हरीतक्रांतीने आपण स्वयंपूर्ण झालो आहोत आणि संपूर्ण विश्वाला उदर भरण्यासाठी आवश्यक शेतमाल पुरवण्यासाठी आपला देश सक्षम होत असल्याचे आश्वासक प्रतिपादन देखील मा. राज्यपालांनी केले. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य, ही दोन्ही सरकारे विविध योजनाही राबवत आहेत. देशात नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे.अलीकडे शेतकरी किटकनाशकांचा वापर कमी प्रमाणात करू लागले. सौरऊर्जेचा वापर सुरु झाला. शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर होतो आहे. फलोत्पादनाला प्रोत्साहन मिळते आहे. फूल शेतीला आपल्याकडे मोठा वाव आहे. पशूधन, जलक्षेत्राशी निगडीत व्यवसायात संधी आहेत. मत्स्य उत्पादनात भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर पोचण्याची गौरवास्पद कामगिरी करू शकला. मातीचा पोत सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागेल. चांगले बी-बियाणे, वाण शोधावे लागतील. पाण्याचा काटकसरीने वापर, जलपुनर्भरणाच्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिक्षण, विस्तार, संशोधनासह विविध क्षेत्रात चालवलेल्या कामांविषयी देखील राज्यपालांनी कौतुक केले. कृषी क्षेत्रात रोजगार- स्वयंरोजगारसह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सेवेच्या संधी उपलब्ध असून कृषी विषयक शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या पदवीधरांमधून गावोगावी कृषी उद्योजक निर्माण होत शेती क्षेत्राला खऱ्या अर्थाने सर्वोत्तम दर्जा देण्याचे महत्तम कार्य साकारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या "मॉडेल व्हिलेज" उपक्रमाची त्यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रशंसा केली व अशा पद्धतीने राज्यात मोठ्या संख्येने आदर्श गावांची निर्मिती साध्य होईल असा आशावादही राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला.
तर आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी व उद्यान मंत्री मा.ना.ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. दीक्षान्त सोहळ्यात पदवी घेतलेल्यांचे काम आता खऱ्या अर्थाने येथून पुढे सुरु झाले असून या देशात कृषि शास्त्रज्ञांच्या निरंतर मेहनतीतूनच देशात हरीतक्रांती घडून आज आपणअन्नधान्यात स्वयंपूर्ण आहोत असे प्रतिपादन करतांना कृषि पदवीधरांनी देखील त्यांच्या कामाचा आदर्श घेत शेतकरी, समाज, देशासाठी काम करावे असे आवाहन ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.
आज वातावरण बदलाने असंख्य प्रश्न तयार केले आहेत. या वातावरणात टिकाव धरतील असे वाण शेतकऱ्यांना हवे आहेत. कृषी पदवीधरांनी आजवर घेतलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा फायदा आता शेती आणि शेतकऱ्यांना करून द्यावा. कृषी पदवीधरांनी मातीशी नाळ टिकवून ठेवत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे देखील कोकाटे यांनी सांगितले. आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात कृषिमंत्री कोकाटे यांनी भविष्यातील शेती आणि कृषी पदवीधरांची उत्कृष्ट सांगड घालत शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ठळकपणे अधोरेखित केला.
कृषी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृहात पदविकांक्षीच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचे प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पदविकांक्षींसमोर दीक्षांत भाषण करताना भारतीय प्रशासन सेवेतील भूतपूर्व अधिकारी, कर्नाटक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. अशोक दलवाई यांनी
यांनी भविष्यातील जागतिक स्पर्धेचे गणितच विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले. भारतीय कृषी शिक्षण, भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राचे महत्त्व, भारतीय संस्कृती आणि कृषी क्षेत्र, कृषी तंत्रज्ञान, राज्यातील कृषी क्षेत्रांची सद्यस्थिती, ॲग्री स्टार्टअप, व अंतर्गत उपलब्ध असलेल्या संधी आदींवर अतिशय विस्ताराने बोलताना डॉ. दलवाई यांनी उपस्थित युवा वर्गाला उज्वल भविष्य विषयी अवगत केले तसेच त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या उपक्रमांचे, आजवर केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या विद्यापीठाने विविध पीकवाण, यंत्र तंत्रांचा शोध लावत शेतकऱ्यांना फायदेशीर काम केले. सध्याही सुरु आहे. विद्यापीठ उच्चतम योगदान देत असल्याचे सांगितले. शिकणे ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. पदवी हा शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. निर्माण झालेली आव्हाने सुधारण्यासाठी, उत्कृष्टतेसाठी संधी देतात. यातील यशाचे रहस्य कठोर परिश्रमात आहे. व्यावहारिक जीवनात ज्ञानाचा वापर खऱ्या पदविधराचे प्रतीक मानले पाहिजे. त्यामुळे या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व अहवाल वाचन विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. शरद गडाख यांनी केले.
या समारंभाचे प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. आकाश फुंडकर यांची सन्माननीय अतिथी म्हणून तर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचे सह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू सोबतच विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य विचार मंचावर उपस्थित होते. तर विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल,मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे, भूतपूर्ण विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य सर्वश्री. कृष्णा अंधारे, गणेश कंडारकर, गोपी ठाकरे आदीची सभागृहात उपस्थिती होती.
आज संपन्न झालेल्या या भव्य दिव्य तितक्याच शानदार आणि शिस्तबद्ध दीक्षांत समारंभात एकूण 3360 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्यात. यामध्ये बी.एस्सी (कृषि) 1550, उद्यान विद्या 105, वन विद्या 22, कृषि जैव तंत्रज्ञान 44, कृषि व्यवसाय व्यवस्थापन 51, बी. टेक. अन्नशास्त्र 38, बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) 147, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) 269, उद्यान विद्या 41, वनविद्या 12, कृषि अभियांत्रिकी 23, एम. बी. ए (कृषि) 24, एम. एस्सी कृषि जैव तंत्रज्ञान 09, पीएच.डी 21 आदीचा समावेश होता. उपरोक्त 3360 स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात 25 आचार्य पदविधारक, 378 स्नातकोत्तर, 2274 पदवीपूर्व पदवीकंक्षी स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारल्या व उर्वरित 687 स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी स्वीकारतील. यंदा एकूण 23 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 13 रौप्य, 18 रोख बक्षिसे व पदके प्राप्त करीत इतर विद्यार्थ्याना प्रेरित केले आहे. तर 1 उत्कृष्ट शिक्षक, 10 उत्कृष्ट संशोधक, 2 उत्कृष्ट कर्मचारी व 1 उत्कृष्ट संशोधन परितोषिक यांचा समावेश होता.
आज सकाळी ठीक 11:00 वाजता सुरु झालेल्या या समारोहात निमंत्रित मान्यवर व पदवीकांक्षी विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी व पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तत्पूर्वी वाद्य वृंदाद्वारे मान्यवरांना दीक्षांत मिरवणुकी द्वारे कार्यक्रम स्थळी आगमन झाले राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कुलसचिव डॉ.एस.के ठाकरे यांनी कुलपतीना दीक्षांत समारंभ सुरू करीत असल्याचे घोषित करण्यासंबंधी निवेदन केले. माननीय कुलपतींच्या मान्यतेने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यापीठ गीत,सरस्वती वंदना झाली. माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या स्वागत पर भाषणानंतर पदवीदान समारंभाला प्रारंभ झाला विविध गुणवत्ता व पारितोषिक धारण धारकांना त्यांची पदके व पारितोषिके मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सर्व नवपदवीकांक्षीना कुलपतींनी दीक्षांत उपदेश दिला. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रगीता नंतर कुलपतीनी दीक्षांत समारंभ संपन्न झाल्याचे घोषित केले.
0 Comments